This was much in details. Thank you.-
MANDAR SANT
अखिल मानव जातीला शांतीसुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या विश्वसंत श्री. सदगुरु पै माऊली यांना व त्यांना सावली सारख्या साथ देणाऱ्या सौ. माईंना अनंतकोटी नमस्कार.
सर्वांना सप्रेम विनम्र अभिवादन.
हिंदू संस्कृती ही विज्ञानावर आधारित आहे. हिंदू संस्कृतीतील अनेक प्रथांचा उगम हा विज्ञानाच्या पायावर आधारित असा आहे. म्हणून या प्रथा जीवनाला उपयुक्त अशा आहेत. असे श्री. सदगुरूंनी अनेक प्रवचनातून सांगितले आहे.. काळाच्या ओघात हे विज्ञान उलगडून दाखवणारे ग्रंथ नाहीसे झाले. तसेच ज्यांच्याजवळ हे विज्ञान होते त्यांनी ते मुक्त हस्ताने इतरांना दिले नाही. त्यामुळे ज्ञान ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली होती. हे ज्ञान जर पिढ्यानपिढ्या सर्वांना वाटले गेले असते तर ते वाढत गेले असते कारण त्यावर संशोधन होत राहिले असते. आणि त्याचा सर्वांना खूप उपयोग झाला असता. आपल्या काही पुर्वजांच्या संकुचित वृत्तीचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम भारतीय समाजाला पुर्वी भोगावे लागले आणि आजही भोगावे लागत आहेत.
काळाच्या ओघात अनेक ग्रंथ नाहीसे होणे व ज्ञान जास्त लोकापर्यत पोहोचलेले नसणे यामुळे अनेक प्रथांचा उगम जरी विज्ञानावर आधारित असला तरी त्यामागची कारण मिमांसा आपल्याला बरीच शोधावी लागते. आणि काही वेळेस जेंव्हा ही कारण मिमांसा स्पष्ट करून सांगता येत नाही तेंव्हा ती प्रथा कधी कधी विचित्र वाटू शकते. पण ज्या ज्या प्राचीन प्रथा आहेत त्यामागे विज्ञान आहे हे निश्चित.
तुळस घरासमोर लावणे किती चांगली गोष्ट आहे हे आता आपल्याला माहीत झाले आहे. ती औषधी तर आहेच शिवाय ती ओझोन वायू बाहेर सोडते. ज्या ओझोन मधून प्राणवायू निर्माण होतो. वृक्षांना देवता समजणे त्यांची नीट जोपासना करणे, गाय, बैल या सारख्या उपयुक्त प्राण्यांशी माणुसकीने वागणे, त्यांचा नीट संभाळ करणे या किती चांगल्या गोष्टी आहेत. तसेच लग्नाआधी नवरा-नवरीला हळद लावणे, बाळंतीणीला कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ घालणे या चांगल्या प्रथा आहेत कारण हळद व कडुनिंब या जंतुनाशक आहेत. या प्रथा उदाहरण दाखल सांगितल्या आहेत. अशा अनेक चांगल्या प्रथा हिंदू समाजात आजही प्रचलित आहेत. आयुर्वेद , योगासने यांची उपयुक्तता साऱ्या जगाने जाणली आहे व आज जगभर त्याचा प्रसार झाला आहे.
निरनिराळे साजरे करणे म्हणजे जीवनात वारंवार आनंदोत्सव साजरा करणे होय. तसेच प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवत असतो.
हिंदु समाजातील काही प्रथा या वाईट आहेत.त्या समाजात दुषित वातावरण निर्माण करणाऱ्या आहेत. जसे जातीभेद. हा वैदिक काळात नव्हता तेंव्हा कर्म स्वातंत्र्य होते. नंतर कर्मावरून जात व त्यावर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद निर्माण झाला. सतीची चाल तर माणुसकीला काळिमा फासणारी होती. सालंकृत कन्यादानाची अपेक्षा हाही असाच मनाची कोती वृत्ती दाखवणारा प्रकार आहे. हुंडा-बळी अशाच कोत्या मनोवृत्तीतून निर्माण होतात.
स्त्री-पुरूष भेद वेदिक काळात नव्हता त्या काळात गार्गी-मैत्रियी या सारख्या पंडिता होऊन गेल्या. पण त्यानंतरच्या काळात परकीय आक्रमणे झाली ते स्त्रियांना पळवून नेत. त्यामुळे स्त्रियांच्या बाहेर वावरण्यावर बंधने आली, त्या शिक्षणापासून वंचित झाल्या, त्यांची लवकर लग्ने होऊ लागली यातून बालविवाहासारखी प्रथा निर्माण झाली. पूर्वीच्या काळात मृत्यू दराचे प्रमाण जास्त असल्यामुळे बालविधवांचा प्रश्न निर्माण झाला. स्त्रियांना दुय्यम वागणूक अजूनही बऱ्याच ठिकाणी समाजात मिळते . आता स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे त्याचे मूळ स्त्री-पुरूष सामाजिक भेद, सुसंकृतपणाचा अभाव हेच आहे.
काळाच्या ओघात निर्माण झालेल्या अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना हिंदू धर्म-हिंदू संस्कृती असे म्हणता येणार नाही. पण भारतीय संस्कृती-हिंदू संस्कृती म्हणजे परदेशी लोक या सर्व गोष्टी गृहित धरतात.
अशा प्रकारच्या या विघातक प्रथा म्हणजे आपली संस्कृती नव्हे तर विकृती आहे असे श्री. सदगुरू म्हणतात. आणि जीवनविद्या त्यांचा कडक शब्दात निषेध करते. जीवनविद्या स्त्रियांना कुटूंबात आणि समाजात मानाची वागणूक मिळावी असा आग्रह धरते आणि त्यासाठी समाज प्रबोधनातून लोक जागृती करते. जातीभेदाचाही जीवनविद्या निषेध करते आणि त्याविरूध्दही समाज जागरण करते.
आपल्या संस्कृतीमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत सर्वांच्या हिताच्या आहेत त्या सर्वांचा आपण पुरस्कार केला पाहिजे. ज्या गोष्टी केवळ कर्मकांड म्हणून केल्या जातात त्यांचा मात्र जीवनविद्या पुरस्कार करत नाही. धर्म या संकल्पनेतून जर शहाणपण वजा केले तर ती धर्माची राख म्हणजे कर्मकांड असे श्री. सदगुरू मंगल कलश या ग्रंथात म्हणतात. (पृ.३२) . शहाणपण हाच खरा धर्म होय असे जीवनविद्या सांगते. The essence of true religion is wisdom. ही जीवनविद्येची शिकवण आहे.
सर्वसामान्यपणे ज्याला संस्कृती असे म्हणतात , मोहोंजदारो, सुमेरियन, बाबिलोनियन वगैरे यांना श्री. सदगुरू civilization असे म्हणतात. ते जीवनविद्येचा मंगल कलश" या ग्रंथात म्हणतात की civilzation चा संबंध आधिभौतिक सुधारणांशी म्हणजेच पर्यायाने शरीराशी येतो तर या उलट संस्कृतीचा संबंध हा मानवी मनाशी येतो.
हिंदू हा शब्द सिंधू वरून आलेला आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यात रहाणाऱ्या लोकांच्या संस्कृतीला सिंधू संस्कृती किंवा हिंदू संस्कृती असे ओळखले जाते. हिंदू संस्कृतीचा किंवा धर्माचा कोणताही एक विशिष्ट ग्रंथ नाही. ही एक विचार प्रणाली आहे. आणि ती अतिशय उदारमतवादी आहे.येथे ईश्वराची भक्ती करण्यासाठी वेगवेगळ्या संप्रदायांना तर स्थान आहेच पण चार्वाकाच्या निरीश्वरवादालाही स्थान आहे. हिंदू संस्कृतीची अनेक सुंदर अशी वैशिष्ठ्ये असल्याने श्री. सदगुरूंना हिंदू संस्कृतीविषयी अत्यंत आदर आहे.
conventional culture मुळे जेंव्हा देवाबद्दलच्या कल्पना, धर्माबद्दलच्या भावना, देशाभिमान, भाषाभिमान या गोष्टींविषयी आग्रह, आपले तेच श्रेष्ठ आणि बाकी सारे कनिष्ठ अशी अगदी टोकाची भावना निर्माण होते. तेंव्हा कलह, संघर्ष, तंटे-बखेडे व युध्द-लढाया होतात.
म्हणूनच सर्व मानवजातीचा विचार करणाऱ्या मानवी संस्कृतीचा जीवनविद्या पुरस्कार करते. जीवनविद्येने मानवी संस्कृतीची व्याख्या केली आहे. आणि ती अशी आहे. "इष्ट किंवा अनिष्टकारक चैतन्यशक्तीचे (cosmic life force) निसर्गनियम व त्यांचे मानवी जीवनावर होणारे बरे-वाईट परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी समाजावर जे संस्कार केले जातात, त्या संस्कारातून जी साकार होते तिला मानवी संस्कृती असे म्हणतात."
थोडक्यात निसर्ग नियमांचा मानवी जीवनावर आपल्या कर्मावर आधारित बरा-वाईट परिणाम होतो हे जाणून जर आपण समाजावर संस्कार केले तर त्यातूनच सुसंस्कृत समाज निर्माण होईल आणि तिलाच मानवी संस्कृती असे म्हणता येईल.
श्री. सदगुरू आपल्याला असे पुढे सांगतात की, मानवी संस्कृती ही ५ घटकांवर आधारित आहे. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान. ही मानवी संस्कृती जगातल्या यच्चयावत् लोकांसाठी एकच आहे. आणि ही मानवी संस्कृती अखिल जगाला सुखी करण्यासाठी पूर्णपणे समर्थ असून असे सामर्थ्य जगातल्या कोणत्याही इझम मध्ये नाही किंवा जगातल्या कुठल्याही धर्मातही नाही.
मला असे वाटते की,जीवनविद्येचे भारतीय संस्कृती व मानवी संस्कृती या विषयी काय विचार आहेत? याची थोडी कल्पना या पत्रावरून येईल. जिज्ञासूंनी कृपया श्री. सदगुरूंनी लिहिलेले जीवनविद्येचा मंगल कलश व धर्म समज-गैर समज हे ग्रंथ जरूर वाचावेत.
विश्वप्रार्थना व कृतज्ञतेने श्री. सदगुरू स्मरण सर्वांना सोबत करो ही श्री. सदगुरू चरणी तळमळीची प्रार्थना........
विठ्ठल विठ्ठल.........
डॉ. नूतन पोळ