"चैतन्य स्वरूपात विचाराला विचार रुपाने स्फुरण्यासाठी जो अवकाश, तो अवकाश म्हणजेच विचारात सूक्ष्म रुपाने वास करून असणारे आकाश तत्व होय." पान क्र. ६३ व ६४
सर्वांना नमस्कार,
या एका वाक्याभोवती योग, याग, नामस्मरण, विश्वप्रार्थना वगैरे सर्व प्रकारच्या उपासनांची कार्यपध्दती गुंफुलेली आहे इतके हे वाक्य महत्वाचे आहे असे मला वाटते. हे वाक्य म्हणजे या सर्वांचा पाया आहे असेही म्हणता येऊ शकेल. बऱ्याच जणांची अशी समजूत असते की, मनांत विचार नसणे म्हणजे समाधी अवस्था होय. हे जरी खरे असले तरी ते अर्धसत्य आहे असेच म्हणायला लागते. प्रत्यक्षात मनात कोणताही विचार नसल्याची स्थिती आपल्याला क्षणोक्षणी प्राप्त होत असते फक्त आपल्याला त्याची जाणीव होत नाही इतकेच म्हणता येईल. प्रथमदर्शनी ह्या वाक्यावर विश्वास बसणे अवघड वाटते.
(६४)सामान्य माणसाचा अनुभव असा की एका क्षणात त्याच्या मनात हजारो विचार येऊन जातात, पण त्याला त्याचा पत्ताच नसतो.() आपल्या मनात एकावेळी एकच विचार असू शकतो. म्हणजेच दुसऱ्या विचाराला मनात प्रवेश करता यावा यासाठी मनात असलेल्या पहिल्या विचाराला मनातून बाहेर पडणे आवश्यक आहे. किंवा हा पहिला विचार मनातून बाहेर पडल्यावरच दुसरा विचार मनात प्रवेश करू शकतो असेही म्हणता येईल. याचाच आणखीन खोलात जाऊन विचार केला तर असे लक्षात येते की, मनातून पहिला विचार निघून गेला आहे मात्र दुसऱ्या विचाराने अजून मनात प्रवेश केलेला नाही अशी स्थिती असावयास पाहिजे. अशी स्थिती असते व या स्थितीत आपण चैतन्याशी एकरूप झालेलो असतो. या चैतन्यमय अवस्थेत असतानाच दुसरा विचार मनात प्रवेश करतो आणि म्हणूनच सद्गुरू म्हणतात (६३) विचारांत जे विलक्षण सामर्थ्य आहे याचे प्रमुख कारण म्हणजे विचार किंवा वृत्ती म्हणजे प्रत्यक्षात चैतन्याची स्फुर्तीच होय.() मात्र ही अवस्था आपल्याला जाणवत नसल्यामुळेच दोन विचारात एक प्रकारची सलगता आपल्याला आढळून येते.
आपण थिएटरमधे जाऊन सिनेमा पाहातो तेव्हां एका सेकंदाला १६ या गतीने एकामागोमाग एक चित्रे पडद्यावर उमटतात व ती चित्रे हालचाल करत आहेत असे भासते प्रत्यक्षात मात्र दोन चित्रांच्यामधे पडद्यावर अंधार असतो. पण पडद्यावर होणारा अंधार आपण जाणू शकत नाही. तोच प्रकार विचारांच्याबाबतीतही होतो. मात्र आपण आपल्या डोळ्यांची क्षमता वाढवू शकत नाही. उलट आपण साधनेद्वारे आपले मन सूक्ष्म करू शकतो व मन निर्विचार असलेली स्थिती अनुभवू शकतो.
थोडक्यात पहिला विचाराने मनातून निघून जाणे (शमणे) व दुसऱ्या विचाराने मनांत प्रवेश करणे (स्फुरणे) या दोन्हीमधील कालावधी (अवकाश) हे आकाशतत्व असून ते विचारात आपोआपच समाविष्ट होत असते असे सद्गुरूंना म्हणावयाचे आहे.
सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.