Jeevanvidya Discussion Forums
February 10, 2012, 02:25:43 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 [2]   Go Down
  Print  
Author Topic: शरीर साक्षात परमेश्वर-ग्रंथ-  (Read 3948 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #15 on: September 16, 2007, 02:51:00 AM »

   
 शरीर एक कामधेनू-

     मानवी शरीर म्हणजे साक्षात कामधेनू आहे. पुराणामध्ये कामधेनूचा उल्लेख केलेला आहे. कामधेनू ही एक गाय आहे व तिचे वैशिष्ट्य असे की, या कामधेनूकडे ज्या कामना कराव्यात त्या सर्व कामनांना फलद्रुप करण्याचे अलौकिक सामर्थ्य त्या गाईत असते. काम म्हणजे कामना आणि धेनू म्हणजे गाय. कामना पूर्ण करणारी धेनू म्हणून तिला कामधेनू असे म्हणतात. अशी ही कामधेनू वशिष्ट ऋषींच्या आश्रमात होती. त्या कामधेनूचा पराक्रम पाहून ती कामधेनू आपल्याला मिळावी अशी विश्वामित्र ऋषींच्या मनात ईच्छा निर्माण झाली. ती कामधेनू विश्वामित्रांच्या स्वाधीन न झाल्यामुळे विश्वामित्र व वसिष्ठ ऋषी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. अशी पुराणात कथा आहे. जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून प्रत्येक मानवी शरीर हीच एक कामधेनू आहे. परंतु मानव जातीला या कामधेनूची ओळख झालेली नाही, हीच मोठी खेदाची गोष्ट होय. मानवी शरीर हे सर्वांगाने व सर्वार्थाने अलौकिक असे आहे. लहानशा बी मध्ये विराट वृक्ष असतो व त्या बी वर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया केल्यावर त्या बीचे वृक्षात रूपांतर होते. त्याचप्रमाणे "पिंडी ते ब्रम्हांडी" या म्हणीप्रमाणे ब्रम्हांड पिंडाच्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपात वास करून असते. मानवी शरीराच्या ठायी पंचमहादेव म्हणजेच पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश ही पंच महाभूते, पंचप्राण, पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, अंतरेंद्रिये, सप्तधातू, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती असे विविध प्रकारचे दिव्य घटक व विविध प्रकारच्या दिव्य शक्ती मानवी शरीराच्या ठायी वास करतात. त्याचप्रमाणे आनंदस्वरूप जाणीवरूप दिव्य चैतन्य शक्ती मानवाच्या ठिकाणी वास करते. थोडक्यात वरील सर्व घटकांनी युक्त असलेले मानवी शरीर प्रत्यक्षात , अक्षरशः भव्य व दिव्यस्वरूप आहे. एका साध्या अणूमध्ये प्रचंड उर्जा शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. मग मानवी शरीराच्या ठिकाणी किती सामर्थ्य असेल याची कल्पना केलेली बरी. म्हणूनच जीवनविद्या सांगते की, मानवी शरीर ही कामधेनू आहे. तुम्ही या शरीररूपी कामधेनूकडे ज्या ज्या कामना व्यक्त कराल त्या सर्व कामना फलद्रुप करण्याचे अलौकिक सामर्थ्य या शरीररूपी कामधेनूत आहे. धेनूला किंवा गाईला चारा दिल्याशिवाय व तिची योग्य ती निगा व काळजी घेतल्याशिवाय ती आपल्याला दूध देत नाही, त्याचप्रमाणे शरीररूपी कामधेनूला सतत श्रम किंवा कामरूपी चारा दिल्याशिवाय व तिची योग्य ती निगा व काळजी घेतल्याशिवाय ही शरीररूपी कामधेनू आपल्या कामाला येत नाही. योग्य दिशेने व योग्य कार्यास्तव माणसाने सतत काम करीत राहिले पाहिजे, कष्ट केले पाहिजे व प्रयत्न केले पाहिजे, तरच ही शरीररूपी कामधेनू प्रसन्न होते व माणसाच्या सर्व कामना फलद्रुप करण्यासाठी प्रवृत्त होते. या संदर्भात विश्वामित्रांचे उदाहरण परत घेऊ. कामधेनू प्राप्त होत नाही म्हणून विश्वामित्र नाराज झाले. परंतु भगीरथ प्रयत्न करून याच विश्वामित्रांनी तपश्चर्येच्या बळावर म्हणजे कष्ट व अभ्यास यांच्या सामर्थ्याने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे प्रचंड सामर्थ्य प्राप्त करून घेतले. वसिष्टांच्या कामधेनूपेक्षा विश्वामित्रांची शरीररूपी कामधेनूच सहस्त्रपटीने श्रेष्ठ ठरली. दुर्दैवाची गोष्ट अशी की, मानवी शरीर ही कामधेनू आहे व आपल्या सर्व इष्ट किंवा अनिष्ट कामनाना फलद्रुप करण्याचे अलौकिक सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे, याचीच जाणीव मानवजातीच्या ठिकाणी नसल्यामुळे मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.

  समर्थ रामदास स्वामी सांगतात-

    "उभा कल्पवृक्षातळी दैन्य वाहे
   घरी कामधेनू पुढे ताक मागे"


  या संदर्भात जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिध्दांत आहे तो म्हणजे,

  "To work with love, sincerity and honesty is worship of God on the one hand and it is a great service to the nation on the other."         
   
   याचा अर्थ गोडीने मनापासून व प्रामाणिकपणे काम करणे, म्हणजे प्रत्यक्षात देवाची उपासना व राष्ट्राची सेवा होय. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की अपवाद वगळता माणसे काम करण्यास टाळाटाळ करतात किंवा कसे तरी काम उरकण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक असे करणे म्हणजे सर्वांचीच फसवणूक करणे होय. हे पाप करून माणूस स्वतःला तर फसवितोच शिवाय तो कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला व देवालाही फसवितो. हे पाप निसर्ग देवतेच्या दरबारात दखलपात्र गुन्हा ठरते. "पोटासाठी काम करावयास लागणे" हा निसर्गाचा अटळ नियम आहे. कुठल्याही परिस्थितीत माणसाने पोटासाठी काम केलेच पाहिजे, अशी जर वस्तुस्थिती आहे तर काम टाळण्यात किंवा काम कसे तरी उरकण्यात काय अर्थ आहे बरे? असे केल्याने त्याला स्वतःलाच जीवनात अपयश प्राप्त होऊन त्याचे अनिष्ट परिणाम त्याच्यासकट त्याच्या कुटुंबातील सर्वांना भोगावे लागतात. याच्या उलट "पोटासाठी काम केलेच पाहिजे" असा निसर्गनियमच असल्यामुळे काम करायचे झाले तर रडत-रडत किंवा रखडत-रखडत करण्यापेक्षा हसत-हसत व मन प्रसन्न ठेवून आवडीने काम करणे सहस्त्रपटीने श्रेष्ठ नाही का? असे आवडीने गोडीने काम केल्याने ते काम खूपच चांगले होते व चांगले काम केल्याचे समाधान आपल्याला प्राप्त होते. शिवाय उत्तम काम केल्याने मालक किंवा वरिष्ठ प्रसन्न होतात, जीवनात प्रगती होते, आर्थिक प्रगती सुधारते. आरोग्य चांगले रहाते व त्याचे इष्ट परिणाम त्याच्या कुटुंबावर, समाजावर व राष्ट्रावर होतात. त्याचप्रमाणे उत्तम काम केल्याने शरीररूपी परमेश्वराची उत्कृष्ट सेवा घडते, परिणामी त्याच्यावर परमेश्वरी कृपेचा वर्षाव होतो. कळत किंवा नकळत माणसे या शरीररूपी कामधेनूकडे अज्ञान, अंधश्रध्दा व अहंकार यांच्या आहारी जाऊन अनिष्ट कामना व्यक्त करीत असतात, परिणामी त्या अनिष्ट कामनांना शरीररूपी कामधेनू अनिष्ट प्रतिसाद देते. जाणीवपूर्वक इष्ट व उत्कृष्ट कामनांचा परिपोष करण्याचे ज्ञान बहुतेक लोकांकडे नसते. त्याचमुळे मानवी जीवनात सुख कणभर व दुःख मणभर, अशी परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात या शरीररूपी कामधेनूकडे इष्ट कामना व्यक्त करायच्या की अनिष्ट कामना व्यक्त करायच्या हे तू ठरवायचे आहे अन्य कोणीही नाही.

 म्हणूनच जीवनविद्या सांगते-
 
     'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'   

          
« Last Edit: April 21, 2008, 09:46:23 PM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #16 on: September 17, 2007, 05:50:31 PM »

     
   शरीर एक परीस-

   मानवी शरीर एक मौल्यवान परीस आहे.  पुराणामध्ये परीस या मौल्यवान वस्तुचा उल्लेख केलेला आहे. या परीसाचे महत्त्व असे की, त्याचा लोखंडाला स्पर्श झाला की, लोखंडाचे सोने होते. परंतु लोखंडाचे 'सोने करणे' या व्यतिरिक्त परिसाजवळ अन्य काहीही सामर्थ्य नाही. याच्याउलट मानवी शरीररूपी परीसाचे आहे. हा मानवी शरीररूपी परीस विशिष्ट परिस्थितीत ज्याला ज्याला स्पर्श करतो त्या सर्वांचे ’सोने’ करतो.  याच्याउलट विशिष्ट परिस्थितीत तोच शरीररूपी परीस ज्याला ज्याला स्पर्श करील त्याची माती करून टाकतो. सुंदर विचार, मधुर उच्चार व उत्कृष्ट आचार या सर्वांनी भरलेला व भारलेला परीस या जगात कुठेही गेला किंवा कुठल्याही क्षेत्रात त्याने प्रवेश केला तरी तो आपल्या अलौकिक सामर्थ्याने तेथील परिस्थिती व वातावरण सोनेरी करील, सुरळीत व सुगंधित करील. हे घडवून आणण्यासाठी शरीररूपी परीस विशिष्ट प्रक्रियेने चार्ज (Charge) केला पाहिजे. उत्तम शिक्षण, उत्कृष्ट शिकवण व सुंदर संस्कार यांच्या द्वारा शरीररूपी परीस बालपणापासून प्रभावीपणे भारला गेला पाहिजे. तरच तो शरीररूपी परीस मानवी जीवनातील सर्व क्षेत्रात जेथे जाईल तेथील सर्व वस्तुंना,  परिस्थितीला व माणसांना स्पर्श करील व त्या सर्वांचेच रूपांतर "सुवर्णात"करील.  याच्याउलट निकृष्ट दर्जाचे शिक्षण, अनिष्ट शिकवण, गलिच्छ संस्कार, अज्ञान, अंधश्रध्दा, अहंकार व असहिष्णुता, या सर्व अनिष्ट गोष्टींनी भारलेला शरीररूपी परीस जेथे जाईल तेथे स्पर्श करीत  सर्वांची माती करील.

    थोडक्यात शरीररूपी परीस असा विलक्षण आहे की, स्पर्श करून सोने करण्याचे किंवा स्पर्श करून माती करण्याचे प्रचंड सामर्थ्य या शरीररूपी परीसाच्या ठायी वास करते. म्हणून स्पर्श करून सोने करणारा परीस तुम्हाला हवा की स्पर्श करून सर्वांची माती करणारा परीस हवा हे तूम्हींच ठरवायचे आहे अन्य कोणीही नाही.

म्हणूनच जीवनविद्या सांगते-

    'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'       
   
« Last Edit: February 29, 2008, 12:22:50 AM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #17 on: September 18, 2007, 03:07:34 AM »

  शरीर एक दिव्य बॅंक

     दैनंदिन जीवनात पैशाचे व्यवहार करताना माणसाचा बॅंकेशी संबंध येतो. जरूरीप्रमाणे पैसे खर्च केल्यानंतर उरलेले पैसे आपण बॅंकेत जमा करतो. काटकसरीने जीवन जगणाऱ्या माणसाला सर्वसाधारणपणे पैशाची बचत करता येते. किंबहुना काटकसरीने जीवन जगून माणसाने जास्तीत जास्त बचत  करून बॅंकेत पैसे जमा करणे आवश्यक असते. हे बचत केलेले पैसे भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी, लग्न मुंजीसाठी किंवा प्रसंगी डॉक्टरची बिले भरण्यासाठी उपयोगी पडतात. अशी पैशाची बचत न करणाऱ्या माणसांना जेंव्हा वरील प्रसंगी पैशाची गरज भासते तेव्हा त्यांना इतरांकडे हात पसरण्याची नामुश्कीची वेळ येते. थोडक्यात काटकसरीचे जीवन जगून पैशाची बचत करण्यात खरे शहाणपण आहे. ज्याप्रमाणे माणसाचा बॅंकेशी संबंध येतो त्याचप्रमाणे मानवी जीवनात माणसांचा दिव्य बॅंकेशी संबंध येतो. ही दिव्य बॅंक प्रत्येक माणसाच्या ह्दयात वास करून असते व माणसे त्यांच्या जीवनात जी बरी-बुरी कर्मे करतात त्यांचे सूक्ष्म ठसे (subtle impressions) उमटले जातात व ते ह्दयातील दिव्य बॅंकेत जमा करण्याचे कार्य अंतर्मनाकडून (subconscious mind) घडत असते. हा सर्व प्रकार अत्यंत गुप्तपणे, अचुकपणे, सहजपणे व कुशलतेने शरीराच्या अलौकिक अंतर्गत व्यवस्थेकडून आश्चर्यकारक पध्दतीने घडत असतो. माणसाचे दुर्दैव असे की हा सर्व प्रकार गुप्तपणे व चोखपणे सतत चालत असतो याची जाणीव त्याला नसल्यामुळे त्याच्याहातून जे घडायला पाहिजे ते घडत नाही व जे घडायला नको त्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून घडत रहातात व त्याचे दुष्परिणाम माणसालाच भोगावे लागतात. पाप-पुण्य हे शब्द उच्चारले गेले की अनेक लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात व बहुतेकांना पाप-पुण्याच्या संकल्पना मागासलेपण्याच्या वाटतात. अर्थात असे वाटण्याचे महत्त्वाचे कारण हे की पाप-पुण्याच्या संकल्पनांसंबंधी लोकांनी गल्लत केलेली असते. त्याचप्रमाणे पापाला पुण्य आणि पुण्याला पाप समजण्याची चुकीची पध्दत समाजात रूढ झालेली आहे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की,  पाप-पुण्य या दोन्ही संकल्पना काल्पनिक नसून जीवनाशी प्रत्यक्ष संबंधित आहेत. किंबहुना "पाप-पुण्याचा हिशोब चुकता करणे" म्हणजेच मानवी जीवन असे म्हंटले तर ते अधिक योग्य ठरेल. दुष्कर्मातून पाप निर्माण होते व पापाची परिणती दुःखात होते, याच्याउलट सत्कर्मातून पुण्य निर्माण होते व पुण्याची परिणती सुखात होते.  दुष्कर्म किंवा सत्कर्म दुःख किंवा सुख रूपाने फळण्यापूर्वी ते पाप-पुण्य या स्वरूपात, ते अंतर्मनाच्या द्वारे हदयाच्या दिव्य बॅंकेत जमा झालेले असते. हे पाप-पुण्याचे दिव्य बॅंकेत जमा झालेले सूक्ष्म ठसे मानवी जीवनात प्रकट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत असतात.  मानवी जीवनात जे अनिष्ट विचार, अनिष्ट उच्चार व अनिष्ट  आचार करीत असतात, ते सर्व,  हदयातील  दिव्य बॅंकेत जमा झालेल्या पापांच्या सूक्ष्म ठशांना प्रकट  होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. परिणामी या लोकांची अधोगती व अधःपतन होते.  याच्याउलट माणसे इष्ट विचार- उच्चार-आचार करतात तेंव्हा ईश्वरी बॅंकेत जमा झालेल्या पुण्याच्या सूक्ष्म ठशांना प्रकट  होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. परिणती त्यांना सुख,शांती, यश, समाधान, यश व समृध्दी प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरते. 

  या संदर्भात डॉ. मर्फ़ी यांचे खालील विधान चिंतनीय आहे-

 " When the thoughts deposited in subconscious mind are harmonious, constructive and  peaceful the magic working power of subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings and the best of everything."

        पैशाचे व्यवहार मानवी बॅंकेत बहिर्मनाच्या द्वारे केले जातात. याच्याउलट हदयातील दिव्य बॅंकेचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून अत्यंत गुप्तपणे, अचुकपणे, सहजपणे व कुशलतेने होत असतात. जीवनात माणसांना जी सुख-दुःखे भोगावी लागतात त्यांचा संबंध परमेश्वराच्या कृपा किंवा कोपाशी नसतो, तर त्यांचा संबंध त्यांनी हदयातील दिव्य बॅंकेत  जमा केलेल्या पाप-पुण्याशी असतो. जीवनात चांगले घडले की आपण म्हणतो ही ईश्वराची कृपा होय व वाईट घडले की आपण म्हणतो हा देवाचा कोप झाला. प्रत्यक्षात मात्र परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करीत नसतो, मग तो कुठल्याही धर्माचा, वर्णाचा, वंशाचा किंवा जातीचा असो. माणसांना जीवनात सुख,शांती, यश, समाधान, यश व समृध्दी प्राप्त होते त्याला एकमेव कारण पुण्य प्रभाव हे होय. याच्याउलट माणसाला जीवनात दुःख, क्लेश, कलह, कटकटी व रोग प्राप्त होतात त्याचे मुख्य कारण पाप-प्रताप हे होय.  सर्वसाधारण माणसे पाप-पुण्य या संकल्पनांची टिंगल व हेटाळणी करतात व त्याकडे दुर्लक्ष करतात. डोळे मिटून चोरून दूध प्याले तर आपल्याला कोणी बघणार नाही अशी मांजराची कल्पना असते, परंतु प्रत्यक्षात मात्र धन्याचा पाठीवर बडगा बसल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे पाप-पुण्य या संकल्पनांची टिंगल, टवाळी व दुर्लक्ष केल्याने नियतीकडून निसर्गनियमाप्रमाणे अशा लोकांना योग्य ती शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही.  थोडक्यात मानवी शरीर ही अलौकिक दिव्य बॅंक असून मानवी जीवनात त्याच्या सुख-दुःखाला कशी कारणीभूत ठरत असते हे वरील विवेचनावरून लक्षात येईल. याचाच अर्थ सुखी होणे किंवा दुःखी होणे हे सर्वस्वी माणसाच्याच हातात असते.     
 
   म्हणूनच जीवनविद्या सांगते-

     'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'     
« Last Edit: April 21, 2008, 09:44:40 PM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: 1 [2]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!