dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #2 on: September 22, 2007, 08:53:45 PM » |
|
माणूस त्याच्या स्वतःच्याच विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे निसर्गनियमांना गती देतो व त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असे म्हणतात, आणि त्यानेच निर्माण केलेली त्याचीच शुभ किंवा अशुभ नियती त्याच्या सुख-दुःखाला कारणीभूत ठरत असते. आपण जेंव्हा आरशात पहातो तेंव्हा आपल्याला आरशात आपले प्रतिबिंब दिसते. आपण जशा बऱ्या-बुऱ्या किंवा चांगल्या-वाईट हालचाली करतो त्याप्रमाणे आरशातील प्रतिबिंब तशाच प्रकारे हालचाली करते. आपण जर हात जोडले तर आरशातील प्रतिबिंब आपल्याला हात जोडते. याच्या उलट आपण जर हात उगारला तर आरशातील प्रतिबिंब आपल्यावर हात उगारते. नेमका तोच प्रकार मानवी जीवनात घडत असतो. आपण ज्या जगात रहातो ते जग, हा एक मोठा आरसा आहे. जीवन जगत असताना आपण जे करतो, बोलतो, वागतो त्याचप्रमाणे जगाकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो. जशी आपण क्रिया करू तशीच प्रतिक्रिया जगाकडून आपल्याला मिळत असते. तुम्ही एखाद्याला अहो म्हंटले तर तो दुसरा माणूस तुम्हाला काहो म्हणेल. परंतु तुम्ही त्याला अरे म्ह्टले तर तो तुम्हाला काय रे म्हणेल. तुम्ही एखाद्याचा सन्मान केला तर तो तुमचा सन्मान करील पण तुम्ही त्याचा अपमान केला तर तो सुध्दा तुमचा अपमान करील. थोडक्यात, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पध्दतीने वागाल त्याचप्रमाणे जगाकडून इष्ट किंवा अनिष्ट पध्दतीनेच प्रतिसाद मिळेल. जगाचा इतिहास पाहिला तर क्रिया तशी प्रतिक्रिया या न्यायानेच आतापर्यंत सर्व घटना घडत आलेल्या आहेत. रामायण व महाभारत घडले ते सुध्दा याच पध्दतीने म्हणूनच डॉ. मर्फी सांगतात-
The good you do to others comes back to you in like measure and the evil you do to returns to you by the law of your own mind.
असे असून सुध्दा मानवजात इतिहासापासून काहीही धडे शिकली नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते गत गोष्टीपासून जे धडे शिकत नाहीत ते गधडे होय. म्हणून शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे यातून शुभ नियती निर्माण केल्याने आनंद वाटता-वाटता आनंद लुटण्याची कला साध्य होते. वीज डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, हाताने तिला स्पर्श करता येत नाही, नाकाने तिचा वास घेता येत नाही व जीभेने तिला चाखता येत नाही. तरी सुध्दा वीज अस्तित्वात आहे व तिचा पुरवठा "वायर" मधून करता येतो. त्याचप्रमाणे "सच्चिदानंद" हे आपले स्वरूप असून स्वानंद आपल्यातच असतो पण तो वीजेप्रमाणे ज्ञानेंद्रियांना आकळता येत नाही. असे जरी असले तरी या स्वानंदाचा पुरवठा "शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे" या वायरमधून सर्वांना करता येतो. इतकेच नव्हे तर जो आनंद आपण सर्वांना देऊ, तोच आनंद बुमरॅंग होऊन सहस्त्र पटीने आपल्याकडे परत येईल व आपल्या जीवनात आनंदाची लयलूट करील. विशेष म्हणजे, हे सर्व जगातील प्रत्येक माणसाला स्वतःचे काहीही नुकसान न करून घेता आचरणात आणणे शक्य आहे. ज्या वायरमधून स्वानंदाचा सर्वांना पुरवठा करावयाचा ती वायर खालील विश्वप्रार्थनेच्या रूपात शब्दबध्द केली आहे.
" हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे"
या विश्वप्रार्थनेत "शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे" या चारही गोष्टी समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे "विश्वप्रार्थना करणे" ही एक उत्कृष्ठ साधना असून उत्तम उपासना आहे. भक्तीयोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, हटयोग असे हे सर्व योग विश्वप्रार्थनेत वास करतात. त्याचप्रमाणे "शुभ चिंतन करणे" हेच ध्यान , "शुभ इच्छा करणे" हीच प्रार्थना, "शुभ बोलणे" हेच भजन व "शुभ करणे" हेच पूजन होय. साधनेचे व उपासनेचे हे सर्व प्रकार विश्वप्रार्थनेत समाविष्ट असल्यामुळे, विश्वप्रार्थना करणाऱ्यांना अगणित पुण्याची प्राप्त होते. संसार सुखाचा करण्यासाठी पैसा जितका आवश्यक असतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पुण्य आवश्यक असते. परमार्थात चांगली प्रगती साधण्यासाठी सुध्दा पुण्य पाहिजे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, अर्थ, स्वार्थ, परार्थ व परमार्थ हे सर्व सर्वार्थाने साध्य व सिध्द करण्यासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे. या विश्वप्रार्थनेने आपण स्वानंदाचे प्रक्षेपण सर्वत्र करीत असतो. स्वानंदस्वरूप शुभ चिंतनाने सूक्ष्म विचारांचे आनंद स्पंद आपण कळत नकळत सर्वत्र प्रसृत करीत असतो व तेच आनंदस्वरूप विचारांचे आनंदस्पंद बुमरॅंग होऊन विविध रूपाने आपल्याकडे परत येऊन आपल्यावर आनंदाची बरसात करतात. हे सर्व घडते ते, "क्रिया तशी प्रतिक्रिया" या निसर्ग नियमाप्रमाणे. या संदर्भात फ्रेंच फिलॉसाफर जेम्स ऍलन सांगतात- As you alter your thoughts towards things and other people, the things and other people will alter towards you, The divinity that shapes your ends is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts.
या विश्वप्रार्थनेत ईश्वर स्मरण आहे, त्याचप्रमाणे सुंदर विचार आहेत. विचारांचे सामर्थ्य प्रचंड आहे. माणसाचे भले करण्याचे किंवा वाटोळे करण्याचे सामर्थ्य विचारशक्तीत आहे. माणसाचे जीवन घडवण्याचे किंवा बिघडवण्याचे सामर्थ्य विचारात आहे. त्याचप्रमाणे माणसाचे शरीर ही एक विस्मयकारक रसायनशाळा आहे. या मानवी शरीरात असंख्य रासायनिक प्रक्रिया सतत घडत असतात व त्यांचा शरीरप्रकृतीवर व जीवनावर परिणाम होत असतो. विशेष म्हणजे या रासायनिक प्रक्रियांवर विचारांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. माणसाच्या मनात घोळत असणारे इष्ट किंवा अनिष्ट विचार या रासायनिक पक्रियांना विशिष्ट पध्दतीने गती देतात व त्यामुळे इष्ट किंवा अनिष्ट शक्ती जागृत होऊन, त्याला सुखी किंवा दुःखी जीवन प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरतात. या संदर्भात नॉर्मन पील सांगतात-
Positive thinking sets in motion positive forces which bring positive results to pass.
याच्या उलट प्रकार अनिष्ट चिंतनाने घडतो. थोडक्यात "साकार झालेले विचार" म्हणजेच माणसाचे जीवन होय. बाकीचे सर्व तुम्हाला एकवेळ सोडून जातील पण विचार मात्र आयुष्यभर तुम्हाला चिकटून राहतील. विचारांचा महिमा वर्णन करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. असे जरी असले तरी विचारांचे महत्त्व व सामर्थ्य थोडक्यात वर्णन करणे इष्ट वाटते.
१) जीवनविद्या सांगते की, "विचार" हा अखिल विश्वाचा सम्राट आहे. हा विचारच अखिल विश्वावर आपली सत्ता गाजवत असतो. कल्याण करणे किंवा संपूर्ण सत्यानाश करणे या दोन्ही गोष्टी घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य या विचाररूपी सम्राटात आहे. मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासिला तर असे आढळून येईल की, या विचाररूपी सम्राटानेच अविचाराच्या आधीन होऊन जगात सर्वत्र गोंधळ, वादळ, दुःख, अत्याचार, दुराचार, बलात्कार, युध्द-लढाया अशा अनिष्ट गोष्टींनी थैमान घातले. याच्या उलट विचाररूपी सम्राटाने सुसंस्कृत विचारांच्या आधीन होऊन जगात सुख,शांती, समृध्दी, स्थैर्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
२) विचार हा ईश्वर आहे. First there was thought and thought was God. असा जीवनविद्येचा सिध्दांत आहे. याचाच अर्थ असा की, विचार हा ईश्वर आहे. आपण कुठेही जरी गेलो तरी हा विचाररूपी ईश्वर आपल्याबरोबर असतो. विचार हा ईश्वर आहे याचाच अर्थ असा की, "विचार" हा चैतन्यशक्तीस्वरूप आहे. शक्ती म्हंटली की तिच्यात भले करण्याचे किंवा वाटोळे करण्याचे, दोन्ही प्रकारचे सामर्थ्य असते.
३) विचार गंगोत्री आहे. गंगा नदीच्या उगमस्थानाला गंगोत्री असे म्हणतात मानवी जीवनरूपी नदीचे उगमस्थान विचार आहे म्हणून "विचार" ही मानवी जीवनाची गंगोत्री आहे. गंगा नदी उगमस्थानी अत्यंत छोटी असते परंतु तीच नदी पुढे वहाता वहाता विराट नदीच्या पात्राचे स्वरूप धारण करते. त्याचप्रमाणे मानवी जीवनाच्या उगमस्थानी विचारांचे पात्र लहान असते. परंतु हेच विचार वाहात वाहात मानवी जीवनाचे विराट पात्र या स्वरूपात प्रकट होतात. विचारांचेच रूपांतर उच्चार व आचारांत होऊन मानवी जीवनाचे विशाल पात्र निर्माण होते. परंतु नदीच्या उगमस्थानिच जर पाणी दुषित झाले तर नदीच्या पाण्याचा पुढील प्रवाह सुध्दा दुषित होण्याचा दाट संभव असतो. त्याचप्रमाणे विचार ही माणसाच्या जीवनाची गंगोत्री असल्यामुळे मुळात विचार जर बिघडले तर त्याचे संपूर्ण जीवनच बिघडण्याचा दाट संभव असतो. "माणूस बिघडला किंवा समाज बिघडला" असे आपण जेंव्हा म्हणतो तेंव्हा त्याचा अर्थ माणसाचे किंवा समाजाचे विचार बिघडले असा असतो.
४) विचार हा अल्लाउद्दीनचा दिवा आहे. अल्लाउद्दीनच्या दिव्याची एक गोष्ट अशी सांगतात की, अल्लाउद्दीनला एक काही कारणांमुळे जादूचा दिवा सापडला. अल्लाउद्दीनने दोन हाताने दिवा विशिष्ट प्रकारे घासला की त्या दिव्यातून एक राक्षस निर्माण होऊन तो अल्लाउद्दीनची सर्व बरी-वाईट कामे करीत असे."विचार" हा सुध्दा माणसाला गवसलेला एक जादूचा दिवा आहे. माणसाने बहिर्मन व अंतर्मन या दोन हातांनी, हा विचाररूपी जादूचा दिवा, विशिष्ट प्रकारे हाताळला तर त्या विचारातून एक शक्ती निर्माण होऊन ती त्याला सर्व प्रकारे साथ देते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, "विचार" हा जादूचा दिवा आपल्याजवळ आहे हेच माणसाला ज्ञात नाही व तो जादूचा दिवा विशिष्ट प्रकारे हाताळण्याची कलाही त्याला अवगत नाही.
५) विचार हा अभिषेक आहे. शिवलिंगावर किंवा देवाच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची काही संप्रदायामध्ये प्रथा आहे. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी असा अभिषेक केला जातो. जीवनविद्येच्या द्दष्टीकोनातून असा अभिषेक करण्याची आवश्यकताच नाही कारण, जगातील प्रत्येक माणूस त्याच्या कळत नकळत आयुष्यभर अभिषेक करीत असतो. माणसाच्या डोक्यात शुभ किंवा अशुभ विचारांचे कारंजे सतत उडत असतात व त्यांचा अभिषेक माणसाच्या ह्दयातील आत्मलिंगावर किंवा ह्दयस्थ ईश्वरावर सतत होत असतो. शुभ विचारांचा अभिषेक झाला तर माणसाचे जीवन सुखी व यशस्वी होते. याच्या उलट अशुभ विचारांचा अभिषेक झाला तर त्याचे जीवन दुःखी, अपयशी व वैफल्यग्रस्त होते. ही वास्तवता लक्षात घेऊन सुखी जीवनासाठी अशुभ विचारांचा अभिषेक टाळून शुभ विचारांचा अभिषेक सतत होत राहील याची काळजी घेतली पाहिजे व त्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
६) विचार ही आपली मुले आहेत. आपणच आपल्या मुलांना जन्म देतो व लहानाची मोठे करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करतो. ही मुले चांगली निपजली तर आई-बापांना सुख देतात याच्या उलट हीच मुले दुर्वर्तनी निपजली तर आई-बापांच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. अगदी त्याचप्रमाणे आपणच आपल्या विचारांना जन्म देत असतो. राजा धृतराष्ट्राला शंभर मुले होती पण आपल्याला विचाररूपाने असंख्य मुले असतात. त्याचप्रमाणे आपणच या विचारांची कळत नकळत जोपासना करून त्यांना अधिक प्रबळ करीत असतो. या असंख्य विचारांपैकी जे सुंदर व सुरेख विचार असतात ते आपल्याला सुख, शांती, समाधान देतात. याच्या उलट जर आपण अनिष्ट विचारांची कळत नकळत जोपासना केली तर तेच अनिष्ट विचार आपल्या जीवनात अरिष्ट निर्माण करण्यास व अनिष्ट परिस्थिती घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात.
७) विचार हे आपले वृक्ष आहेत, आपण जमिनीमध्ये झाडे लावतो, त्यांना खतपाणी घालतो, त्यांच्या संरक्षणासाठी कुंपण घालतो व त्यांची योग्य ती काळजी घेतो. त्यामुळेच ही झाडे मोठी होतात व आपल्याला फुले, फळे व सावली देऊन आनंद देतात. वास्तविक हे वृक्ष म्हणजे शंकराचे अवतारच आहेत, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण शंकराने स्वतःसाठी विष ठेवले व जगाला अमृत दिले, त्याचप्रमाणे हे वृक्षराज स्वतःसाठी विषारी कार्बन डाय ऑक्साईड वायु ठेवतात व आपल्याला आपल्या आरोग्यासाठी व जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असा अमृतरूप ऑक्सिजन देतात परंतु जर आपण या वृक्षांकडे दुर्लक्ष केले, त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही, त्यांना खतपाणी दिले नाही, तर हे वृक्ष आपल्याला फुले, फळे व सावली व ऑक्सिजन देऊ शकणार नाहीत. अगदी त्याचप्रमाणे विचार हे आपले वृक्ष आहेत, आपण शेतकरी आहोत व आपले अंतर्मन हे शेत आहे. या अंतर्मनाच्या शेतात शुभ विचाररूपी वृक्षांची पेरणी केली पाहिजे, त्यांच्यावर शुभ चिंतनाचे सिंचन केले पाहिजे, शुभ उच्चार- आचारांचे खत दिले पाहिजे. आणि ह्या विचाररूपी वृक्षांची योग्य ती योग्य ती काळजी घेऊन त्यांची जोपासना केली पाहिजे. असे केले तरच हे विचाररूपी वृक्ष आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद व सुयश देतील, याच्या उलट या विचाररूपी वृक्षांकडे दुर्लक्ष केले, त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही व त्यांची उत्तमप्रकारे जोपासना केली नाही तर या विचाररूपी वृक्षांना कीड लागेल व सर्व वातावरण बिघडविण्यास ते कारणीभूत ठरतील.
थोडक्यात, विचार हा चैतन्यशक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. जीवनाचे वाळवंट करण्याचे किंवा नंदनवन करण्याचे प्रचंड सामर्थ्य विचारांत आहे. या संदर्भात डॉ. मर्फी सांगतात-
The law of your subconscious mind works for good and bad ideas alike. The law when applied in negative is the cause of failure, frustration and unhappiness. However if your habitual thinking is harmonious and constructive, you will experience success, prosperity and perfect health.
जसे विचार त्याप्रमाणे जीवनाला आकार प्राप्त होतो. विचारांचेच परिवर्तन उच्चार व आचार यामध्ये होत असते, म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात व तेच तुमच्या सुख-दुःखाला कारणीभूत ठरतात. मानवी जीवनात विचारांचा पगडा जबरदस्त असून, हे विचारच माणसाच्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवीत असतात. या संदर्भात फ्रेंच फिलॉसाफर एपिक्टेटस सांगतात,
You ought to be more concerned about removing wrong thoughts from your mind than removing tumours and abscesses from your body.
|