Sat he ADHISHTHAN aahe,Chit he PRATISHTHAN aahe aani Aanand he ANUSHTHAN aahe.
सर्वांना नमस्कार,
नमस्कार वर्षाताई,
प्रथमच हे स्पष्ट करतो की, मी सत्-चित्-आनंद ह्या सीडी ऐकलेल्या नाहीत. मी फक्त सद्गुरूंच्या तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथातून मला जे कळल्यासारखे वाटतेय ते मांडायचा प्रयत्न करतोय.
जो सर्व काही करत असतो तो, म्हणजे अधिष्ठान
जे मिळविण्यासाठी सर्वकाही केले जाते ते, म्हणजे अनुष्ठान
हे सर्वकाही करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती, म्हणजे प्रतिष्ठान
सत् म्हणजे (कायमस्वरूपी किंवा शाश्वत) असणे. "मी (जीवंत) आहे" अशी जाणीव आपल्याला कळत नकळत सर्वकाळ असते. ह्याचे कारण हे सत् होय. "मी आहे" ही जाणीव रात्रीच्या गाढ झोपेत सुध्दा असते, फक्त गाढ झोपेत ती आपण जाणू शकत नाही इतकेच. मात्र दुसऱ्या दिवशी गाढ झोपेतून उठल्यावर "काल मला काय गाढ झोप लागलेली होती" हे वाक्य आपण त्या गाढ झोपेबद्दल उच्चारू शकतो. कारण त्या गाढ झोपेतही मी होतो असेच आपल्याला खात्रीपूर्वक व ते सुध्दा आतून वाटत असते. "मी आहे" ही जाणीव अथवा भान आपल्या हातून होणाऱ्या प्रत्येक कार्याचे अधिष्ठान असते आणि म्हणून सत् हे अधिष्ठान आहे असे सद्गुरू म्हणत आहेत. पण मूळ सत् व देहातून व्यक्त होणारे सत् यात फरक एवढाच असतो की, मूळ सत् हे विश्वव्यापी असूनही आपल्या देहामार्फत व्यक्त होणारे सत् हे आपल्या देहापुरतेच मर्यादित आहे असे आपल्याला मनापासून वाटते. इतकेच नव्हे तर इतरांतून व्यक्त होणारे तेच मूळ सत् हे आपल्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे असेही मनापासून वाटते. असे मनापासून वाटण्यालाच भ्रम असे म्हटले जाते.
या भ्रमामुळेच आपण आपल्या ठायी शाश्वत स्वरुपात असलेला आनंद गमावून बसतो. त्यामुळे आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे असे वाटायला लागते. ही जी कमतरता (सद्गुरूंनी यासाठी 'पोकळी' हा शब्द वापरला आहे.) आपल्या जीवनात निर्माण होते ती कमतरता भरून काढणे हे त्यामुळे आपले ध्येय बनते. म्हणजे हा शाश्वत आनंद जो आपण गमावला आहे तो परत मिळविण्याच्या खटाटोपाला आपण लागतो. हा जो खटाटोप आपण करत असतो त्यासाठी जी शक्ती लागते ती चित् होय. फरक एवढाच की ही चित् शक्ती जशीच्या तशी न येता त्या शक्तीचे रुपांतर कार्यशक्तीत होत असते. म्हणूनच सतत काहीतरी केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. त्यामुळेच आपल्याला निवांत होता येत नाही. थोडक्यात चित् हे प्रतिष्ठान आहे असे सद्गुरू म्हणत आहेत.
आपली सर्व धडपड शाश्वत आनंद मिळविण्यासाठी होत असते. तेच आपले ध्येय असते. त्यासाठीच आनंद हे अनुष्ठान आहे असे सद्गुरू सांगत आहेत. फक्त फरक इतकाच असतो की, आयुष्यभर आपण जे काही करत असतो ते हा शाश्वत आनंद मिळविण्यासाठी करत असतो हेच आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना "शाश्वत आनंद" ही संकल्पनाच स्पष्ट झालेली नसते. त्यामुळे हा "शाश्वत आनंद" कसा मिळवावयाचा याचेच ज्ञान आपल्याला सर्वप्रथम मिळवावयाचे आहे व त्यानुसार प्रयत्न करायला पाहिजे आहेत हेही कळत नाही व त्यामुळे आपल्या प्रयत्नांची दिशाच सर्वकाळ चुकत राहाते.
मात्र येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, सत्, चित् व आनंद ह्या तीन गोष्टी भिन्न भिन्न नसून "चैतन्य" ह्या शब्दामधेच या तिन्हींचा समावेश असतो. 'चैतन्य' ही संकल्पना नीट समजावी यासाठी हे वर्गीकरण केले जात असते.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
संदर्भ : - कंसातील आकडे पान क्रमांकाचे आहेत.
(१६७) जीवन जगत असताना माणसाला आपल्या जीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे, याची जाणीव कळत किंवा नकळत सतत सलत असते.
(१९०) त्याचप्रमाणे 'चित्' म्हणजे शुध्द जाणीव या पदाचा जीवाला विसर पडून त्याचे ठायी भ्रम निर्माण होतो.
(१९०) या भ्रमालाच भवभ्रम असेही म्हणतात आणि 'सत्' या पदाचा जीवाला विसर पडून त्याचे ठायी अहंभाव किंवा "मी" पण निर्माण होते.
(१९०) या संदर्भात आणखी एक महत्वाचा सिध्दांत लक्षात घेणे आवश्यक आहे तो हा की, जीवाला स्वत:च्या चैतन्यशक्ती स्वरुपाचा विसर पडल्यामुळे त्या विसरातून शक्तीचे रुपांतर कार्यशक्तीत होते. परिणामी कांही तरी कर्म केल्याशिवाय चैनच न पडणे असा जीवाचा स्वभाव होऊन राहिलेला आहे.